Skip to main content

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग


जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच.

1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ऑलिंपिक स्पर्धा या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताला 200 मी. आणि 400 मी. धावणे या प्रकारामध्ये सुवर्णपदके मिळवून दिली.

1958 च्या कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मी. मधील तत्कालीन विश्वविक्रमवीर माल्कम स्पेंस याला मागे टाकत स्पर्धेचे सुवर्णपदक मिळविले. स्वतंत्र भारताचे राष्ट्रकुल स्पर्धेतील ते पहिले सुवर्णपदक होते. इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांनी मिल्खासिंग यांच्या गळ्यात सुवर्णपदक घातले. यावेळी राष्ट्रगीताच्या धूनवर भारताचा तिरंगा फडकलेला बघणे हा त्यांच्या जीवनातील एकमेव अविस्मरणीय क्षण होता असे ते नेहमी सांगत. 1960 रोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांचे 400 मीटर धावणे या प्रकारातील पदक सेकंदाच्या काही भागामुळे हुकले. ते या रेस मध्ये चौथ्या क्रमांकावर राहिले. भारताला ऑलिंपिक स्पर्धेत ते पदक देऊ शकले नाहीत याचे शल्य त्यांना कायम होते.

यानंतर 1960 साली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध सुधारावेत याचा एक भाग म्हणून पाकिस्तानमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे या स्पर्धेत सहभागी होण्याची मिल्खा सिंग यांची अजिबात इच्छा नव्हती. पण भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहास्तव ते पाकिस्तान मध्ये गेले. त्यांच्या जीवनातील कटू आठवणींमुळे पाकिस्तानात गेल्यापासून ते अत्यंत भावुक झाले होते. पण अशा परिस्थितीतही त्यांनी पाकिस्तानमधील त्यावेळचा वेगवान धावपटू अब्दुल खालिक याला मागे टाकत शर्यत जिंकली. फाळणीच्या दंगलीवेळी मिल्खासिंग यांचा जीव वाचावा म्हणून "भाग मिल्खा..." हे त्यांच्या वडिलांचे शेवटचे शब्द कदाचित त्यांच्या कानावर त्यावेळी पडत असावेत. ही शर्यत बघण्यासाठी उपस्थित असलेले पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना त्यावेळी फ्लाईंग सिख हा किताब दिला.

जिद्द, चिकाटी, देशभक्ती, धाडस हे परिस्थितीने दिलेले गुण त्यांच्यामध्ये होते. देशभक्ती तर त्यांच्या श्वासामध्ये होती. क्रीडाक्षेत्रामध्ये भारताला उच्च शिखरावर नेण्यासाठी त्यांचे योगदान खूपच महत्वाचे होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेली सर्व पदके त्यांनी देशाला समर्पित केली. ही सर्व पदके पटियाला येथील क्रीडा संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. 18 जून 2021 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि खऱ्या अर्थाने संघर्षाने प्रेरित झालेले एक क्रीडा जीवन समाप्त झाले.

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...