Skip to main content

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली. 

वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला होता. तोच आत्मविश्वास 1983 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाला पराभूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. भारतीय संघामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्वाचे काम कपिल देव यांच्यातील नेतृत्वाने केले होते. 

या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी झिंबाब्वे संघाविरुद्ध त्यांनी 138 बॉलमध्ये केलेली 175 धावांची अविस्मरणीय खेळी आणि या स्वतःच्या खेळीवर प्रभावित होऊन स्वतःसाठी बक्षीस म्हणून मर्सिडीज कार बुक करणारा हा खेळाडू सर्व संघासाठी नवीन आदर्श निर्माण करणारा होता. वेस्टइंडीज बरोबरच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी विव रीचर्डस यांचा डीप स्क्वेअर लेगला पळत जाऊन पाठमोरा पकडलेला अवघड कॅच सामन्याला कलाटणी देणारा ठरला आणि भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले. बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग या सर्व बाबीत स्वतः उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी भारतीय संघात एक नवीन ऊर्जा निर्माण केली होती. 'लीडींग फ्रॉम दि फ्रंट' असे त्यांचे नेतृत्व होते. 

1987 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 268 धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी झाल्यानंतर कपिल देव यांनी अंपायरना सांगून ऑस्ट्रेलियाच्या 268 धावांमध्ये दोन धावा वाढविण्याची विनंती केली आणि एकूण 270 धावा नोंद करण्यास सांगितले. याचे कारण म्हणजे सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूने मारलेला षटकार अंपायरनी चुकून चौकार दिला होता. या सामन्यात भारताने फलंदाजी करताना 269 धावा केल्या आणि भारत फक्त एका धावेने पराभूत झाले. जर कपिल देव यांनी त्या दोन धावा वाढविण्यास सांगितले नसते तर भारत त्या सामन्यात विजय झाला असता. पण कपिल देव यांनी असे न करता खिलाडूवृत्ती दाखवली जी खेळासाठी आणि खेळातील नैतिकता टिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. 

कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट्स घेऊन त्यांनी रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला. पुढे 2000 साली कर्टनी वॉल्श यांनी कपिल देव यांचा हा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये चारशे विकेट घेणारा आणि पाच हजार धावा करणारा हा जगातील एकमेव अष्टपैलू खेळाडू 1994 साली क्रिकेटमधून निवृत्त झाला. 

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल

Comments

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...