भारताने आजपर्यंत ऑलिंपिक स्पर्धेत हॉकीमध्ये आठ वेळा सुवर्णपदक, एकदा रौप्यपदक तर तीन वेळा कांस्यपदकाची कमाई केली आहे. 1928 ते 1964 हा भारतीय हॉकीसाठी सुवर्णकाळ होता. 1960 ची रोम ऑलिंपिक स्पर्धा वगळता या कालावधीत प्रत्येक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक कमावले. 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत आठवे आणि शेवटचे सुवर्णपदक भारताला मिळाले. या आठ सुवर्णपदकं मधील सर्वात महत्त्वाचे सुवर्णपदक 1948 च्या लंडन ऑलिंपिक मधील होते. अंतिम सामन्यात भारताने ब्रिटिशांचा त्यांच्याच मातीत 4-0 ने पराभव केला. स्वातंत्र्यानंतर वर्षभरातच ब्रिटिशांचा त्यांच्याच मायभूमीत पराभुत करण्याचा पराक्रम भारतीय हॉकी संघाने केला होता.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व. त्यांचे बॉलवरील नियंत्रण आणि गोल करण्याची क्षमता अफलातून होती. 1928, 1932 आणि 1936 या तीन ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मे.ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळे भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांचा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक कमावले. 1936 च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत भारताने यजमान जर्मनीचा त्यांच्याच मायभूमीत 8 -1 असा पराभव केला. जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या खेळावर प्रभावित होऊन त्यांना जर्मनीचे नागरिकत्व आणि कर्नल पदावर नियुक्तीची ऑफर दिली. अट होती की मे. ध्यानचंद यांनी तिथून पुढे जर्मनीसाठी खेळायचे. मे. ध्यानचंद यांनी नम्रपणे उत्तर दिले की मी भारतीय आहे आणि मी अजन्म भारतासाठीच खेळत राहीन. 29 ऑगस्ट
हा मे. ध्यानचंद यांचा जन्मदिन. हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com
Comments
Post a Comment