Skip to main content

भारतीय क्रीडा चळवळ

1952 हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला खाशाबा जाधव यांच्या रूपाने कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिले पदक मिळाले. यानंतर जवळजवळ चार दशके म्हणजेच 1996 च्या अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत भारताला कोणत्याही वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळाले नाही. अनेक युरोपियन, लॅटिन अमेरिकन देश या काळात क्रीडा क्षेत्रात प्रगतीपथावर गेले. पण भारताचा हॉकी वगळता इतर खेळात असलेला पदकांचा दुष्काळ कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ एकविसाव्या शतकाच्या उदयापर्यंत भारतीय क्रीडाक्षेत्रात उदासीनताच दिसून आली.

स्वातंत्र्यानंतर पुढच्या पन्नास वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या कारणांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात विविध संस्थाने खालसा करण्यासाठी झालेला संघर्ष, 1962 चीन युद्ध, 1965 पाकिस्तान युद्ध, 1971 बांगलादेश मुक्तीयुद्ध यामुळे या दशकांमध्ये क्रीडा क्षेत्राची पीछेहाट झाली. देशावर पडत असलेल्या अतिरिक्त आर्थिक भार यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करता आली नाही.

1983 साली भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर क्रिकेट हा जणू भारताचा राष्ट्रीय खेळ होऊन गेला. क्रिकेटचे साहित्य सहजासहजी उपलब्ध होत होते. बॉल, बॅट आणि स्टंप एवढ्या कमी साहित्यात अनेक जण एकावेळी हा खेळ खेळू शकत होते. क्रिकेटच्या क्रेझ मुळे सहाजिकच इतर खेळांकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. क्रिकेटमुळे खेळाडूंना पैसे मिळू लागले, प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे इतर खेळांमध्ये करियर करण्यापेक्षा क्रिकेटमध्ये करिअर केल्यास जास्त पैसे मिळतील, जास्त प्रसिद्धी होईल असा समज समाजामध्ये तयार झाला. जशी क्रिकेटमध्ये पैशाची इन्वेस्टमेंट झाली तशी इतर खेळांमध्ये झाली नाही. ऍडव्हर्टाईस, स्पॉन्सरशिपमुळे क्रिकेटर श्रीमंत होत गेले. इतर खेळांमध्ये इतका पैसा नसल्यामुळे सहाजिकच प्रत्येकाची पावले क्रिकेट कडे वळू लागली. भारतात क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी हे वातावरण खूपच घातक होते.

जसे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रतीचे क्रीडासाहित्य उपलब्ध होत होते तसे इतर खेळातील क्रीडा साहित्य उपलब्ध होत नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविण्यासाठी अतिऊच्च दर्जाचे क्रीडा साहित्य असणे अत्यंत आवश्यक असते, जे भारतात सहज उपलब्ध होत नव्हते. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयश येण्याचे हे मुख्य कारण होते.

1996 च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये लिअँडर पेसने भारताला पुन्हा एकदा टेनिस या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये देशाला कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारत सरकारने आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा संघटनांनी पारंपारिक क्रीडा प्रणालीमध्ये बदल केला. स्पोर्ट्स पॉलिसी तयार करण्यात आली. क्रिकेटसारखाच इतर खेळांमध्ये सुद्धा पैसा आला. साहित्य-साधने उपलब्ध होऊ लागली. स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स फिजिओलॉजी, स्पोर्ट्स जेनेटिक्स, स्पोर्टस सायकॉलॉजी इ. सारख्या विषयांमध्ये प्रगती होत गेली. भारतीय क्रीडाक्षेत्रात संशोधनामध्ये मध्ये वाढ झाली. खेळाडूंना खाजगी कंपन्यांकडून स्कॉलरशिप, स्पॉन्सरशिप मिळू लागल्या. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खेळाडूंना खेळ देण्यात येऊ लागले. भारतीय सेना सुद्धा यात मागे नव्हती. आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट आणि आर्मी बॉईजच्या माध्यमातून लहान वयातच खेळाडूंना भरती करून घेतले जाते आणि तंत्रशुद्ध आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.

नवीन क्रीडा प्रणालीचा भाग म्हणून खेलो इंडिया यासारखी नवीन स्पर्धा पुढे आली. वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्याची संधी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्राप्त झाली. पुन्हा एकदा भारताला वैयक्तिक खेळांमध्ये पदके मिळू लागली. लिअँडर पेस, कर्णाम मल्लेश्वरी, राजवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा यांनी केलेली सुरुवात नीरज चोप्राच्या 2020 टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदकापर्यंत कायम आहे. सध्या भारत क्रीडाक्षेत्रातील महासत्ता नसला तरी चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या क्रीडाक्षेत्रातील महासत्तांना टक्कर देण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्कीच तयार झालेली आहे.

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com

Comments

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...